भाजप-शिवसेनेची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. यात भाजपच्या वाट्याला 160 तर, शिवसेनेला 110 ते 115 जागा मिळण्याची शक्यता आहे. पाच ते सात जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांची युतीबद्दल भूमिका सकारात्मक असताना जागा वाटपाबद्दल देखील चर्चा सुरू आहे. त्यातच मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप नेत्यांच्या गेल्या दोन दिवसात मॅरेथॉन बैठका झाल्या. कोअर कमिटीची देखील बैठक झाली.

बैठकीत जागा वाटपाचा कच्चा आराखडा ठरवण्यात आल्याची माहिती दिली असल्याचं समजतंय. भाजपच्या वाट्याला 160 जागा घ्याव्यात आणि शिवसेनेच्या वाट्याला 110 ते 115 जागा द्याव्यात, असं या बैठकीत ठरल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप-सेनेत गेल्या काही दिवसात अन्य पक्षातील नेत्यांनी प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यांमुळे जागांचे गणित बिघडले असून, त्यामुळे पाच ते सात जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जागांमध्ये बदल करायचा याची चर्चा दोन्हीही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि औरंगाबाद मध्य या दोन जागा भाजपने शिवसेनेकडून मागितल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे या जागांसाठी भाजप नेते आग्रही आहेत.

महत्वाच्या बातम्या-