अक्षय कुमार खरा हिरो; केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली मात्र कुठेही वाच्यता नाही!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सामाजिक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असतो. चित्रपटच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही तो देशासाठी काही ना काही करताना दिसत असतो. नुकताच त्याने केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

चित्रपट निर्माता प्रियदर्शनने आपल्या ट्विटर अकाऊंद्वारे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना चेक देतानाचा आपला एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत “मी आणि अक्षयने केरळ पुरग्रस्तांना मदत केली आहे. आपण सर्व मिळून केरळला पुन्हा एकदा उभं करुया. ना काही राजकारण ना कोणता धर्म, केवळ माणुसकी म्हणून एकत्र येऊन मदत करू”, असं त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

केरळाला अक्षयने मदत केली असली तरी याबद्दलची कोणतीही माहिती त्याने सोशल मीडियावर दिलेली नाही. त्याने केवळ पूरग्रस्तांना मदत कशी करता येईल याबद्दलचे एक ट्वीट केले होते.

अक्षयकुमारसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ट्वीट करत मदतीचं आवाहन केलं आहे. जॉन अब्राहमनेही केरळमधील परिस्थितीमुळे ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाची सक्सेस पार्टी रद्द केली आहे.