‘मीटू’ला फक्त पुरुष जबाबदार नाहीत; जे होतं ते दोघांच्या सहमतीनं- अरुणा इराणी

मुंबई : मीटू हा शब्द आता साऱ्या देशाला परिचित झाला आहे. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादानंतर साऱ्या देशात वादळ उठलं होतं. कुणी तनुश्रीला पाठिंबा दिला तर कुणी नाना पाटेकरांच्या पाठीशी उभं राहिलं. तनुश्री-नाना प्रकरणानंतर अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या प्रकरणांना वाचा फोडली होती. त्यातून अनेक अभिनेत्यांना अडचणीचा सामना करावा लागला. सिनेमांमध्ये ज्यांना संस्कारी बाबूजी म्हणून ओळखलं जातं ते सुद्धा या प्रकरणातून सुटले नाहीत. बॉलिवूडमध्ये सुरु झालेलं मीटूचं हे वादळ इतर क्षेत्रांमध्येही पसरलं. अनेकांवर आरोप करण्यात आले. मात्र आता हे वादळ शांत झाल्याचं दिसत आहे. असं असलं तरी आता ६ दशकं ज्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलं त्या अभिनेत्री अरुणा इराणी यांनी या विषयाला नव्याने वाचा फोडली आहे.

काय म्हणाल्या अरुणा इराणी?

मीटू प्रकरण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय. या विषयाबद्दल भल्याभल्या अभिनेते-अभिनेत्रींनी चुप्पी साधली. काहीजण मात्र त्यातले नाहीत त्यांनी या विषयावर धडाकेबाज मतं मांडली. आता या यादीत ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांचा समावेश झाला आहे. अरुणा इराणी यांना फिल्म जगताचा ६ दशकांचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांचं मत नक्कीच विचारात घेण्यासारखं आहे.

बॉलिवूडमध्ये जे काही होतं त्यात फक्त पुरुषांची चुकी नसते किंवा महिलांचीही चुकी नसते. जे काही होतं ते दोघांच्या सहमतीनं होतं. सगळं काही स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं. ज्यांना जे करायचंय ते करु द्या, मात्र मला या गोष्टीत नाक खपसायला नको- अरुणा इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री

अरुणा इराणी यांचा अनुभव पाहता त्यांनी सिनेजगताला अत्यंत जवळून पाहिलं आहे. त्यांनी तब्बल ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. असंख्य कलाकारांचा त्यांच्यासोबत संपर्क आला आहे. त्यामुळे अरुणा इराणी यांच्या मताला नक्कीच वजन आहे. अरुणा इराणी एवढंच बोलल्या नाहीत तर त्यांनी आणखीही काही गोष्टी सांगितल्या आहेत.

असं समजा की माझा कोणीतरी गैरफायदा घेतंय. तर मी सुद्धा खूप चालाख असते. मी त्या व्यक्तीला माझा गैरफायदा घेऊ देते कारण का तर त्यात माझाही काहीतरी स्वार्थ दडलेला असतो. त्यावेळी मी विचार करत असते की या बदल्यात मला काय मिळणार आहे. जे चाललंय ते मी होऊ देते. तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्याने माझा गैरफायदा घेतला अन् मी काहीच केलं नाही. असं नसतं, जे होतं ते दोघांच्या सहमतीनं होतं. स्वार्थ असल्यामुळे आपण स्वतःला त्यात झोकून देतो. आपला स्वतःवर ताबा राहात नाही. जे आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला संबंधितापुढे झुकावं लागेल, असा समज करुन घेतो. ती तर शेवटी तुमची निवड असते ना? त्यामुळे मला वाटत नाही की या गोष्टीला फक्त पुरुषच जबाबदार असतात. – अरुणा इराणी, ज्येष्ठ अभिनेत्री

मीटूचा विषय नुकताच कुठे शांत झाला होता. आता त्यात अरुणा इराणी यांच्या वक्तव्यामुळे नवं वादळ उठण्याची शक्यता आहे. अनेकांना अरुणा इराणी यांचं वक्तव्य खरं वाटू शकतं तर अनेकजण त्याला विरोधही करु शकतात.

-या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा