जगभरात कोरोना थैमान घालत असताना या व्हायरसबद्दल आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लक्षणं न दिसणारे कोरोनाचे रुग्ण ही नवी समस्या संपूर्ण जगभरात निर्माण झाली आहे. मेडिकल जर्नल Annals of Internal Medicine मध्ये 3 जून रोजी छापण्यात आलेल्या अहवालात याबद्दल स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांमुळेच कोरोना लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचं समोर येत आहे.
या अहवालात सांगितलं गेलंय की, अशी शक्यता आहे की कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांपैकी तब्बल ४० ते ४५ टक्के लोकांना लक्षणं दिसणार नाहीत. यामुळे कोरोना व्हायरस अधिक वेगाने आणि कुणालाही माहीत न होता पसरत आहे. शोधकर्त्यांनी हा अभ्यास अमेरिकेच्या Scripps Research Translational Institute मध्ये केला आहे.
अहवालात म्हटलंय, की लक्षणं दिसत नसणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला झालेला कोरोना १४ दिवसांपेक्षा अधिक काळ राहू शकतो. हे गरजेचं नाही की लक्षणं न दिसणारे कोरोना रुग्ण कुणाला काही इजा पोहोचवतील. या संशोधकांनी जगातील १६ विविध देशांमधील कोरोना रुग्णांच्या माहितीचा अभ्यास केला, लक्षणं न दिसणारे कोरोनाचे रुग्ण कसे शोधायचे? हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानूसार, लक्षणं न दिसणारे आणि लक्षणं दिसण्याआधीचे रुग्ण यांच्यातील फरकावर काही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अभ्यासातून समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे लक्षणं न दिसणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना काही काळानंतर कोरोनाचे लक्षण दिसू शकतात. इटली आणि जपानमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आढळले. ज्यांना सुरुवातीला लक्षणं दिसत नव्हती, नंतर मात्र लक्षणं दिसायला लागली.
ग्रीक आणि न्यूयॉर्कमधील १० टक्के लोकांना नंतर लक्षणं दिसायला लागली. या अभ्यासात सहभागी झालेल्या किंग काऊंटीच्या २७ पैकी २४ (८८.९ टक्के) जणांना नंतर कोरोनाची लक्षणं दिसायला लागली. यातले बहुतांश लोक वयोवृद्ध तसेच आजारी होते.
भारतात लक्षणं न दिसणाऱ्या लोकांची चाचणी होत नाही-
वरील सर्व आकडे पाहिले तर भारतात होत असलेल्या कोरोनाच्या टेस्टिंगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. ICMR च्या नियमावलीनूसार, फक्त लक्षणं दिसणारे लोकच कोरोनाची टेस्ट करु शकतात. याला कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले लोक अपवाद आहेत. १८ मे ला जारी करण्यात आलेल्या आदेशात असं म्हटलं आहे.
कोरोनाचं संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या म्हणण्यानूसार ICMRने आपल्या कोरोना टेस्टिंगवर संशोधन करायला हवं. नव्या गोष्टी लक्षात घेता जास्तीत जास्त टेस्टिंग करायला हव्यात. ICMRच्या रिसर्च टास्कचे सदस्य आणि PHFI मध्ये महामारी विज्ञान विभागाचे प्रमुख प्राध्यापक गिरीधर बाबू यांचं म्हणणं आहे की अनेक गोष्टींवरुन असं दिसून आलं आहे की लक्षणं न दिसणारे लोक कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसवू शकतात. फक्त १० टक्के लक्षणं न दिसणाऱ्या लोकांमध्ये नंतर लक्षणं दिसू शकतात. सामान्य लोकांमध्ये लक्षणं न दिसणाऱ्या लोकांचं प्रमाण तब्बल ४० टक्के आहे. त्यामुळे टेस्टिंगच्या पद्धतीत बदल करायला हवा.
आरोग्य मंत्रालयाच्या शक्यतेनूसार भारतात फक्त २० टक्के केसेसमध्ये लक्षणं दिसत आहेत. २० टक्क्यांपैकी १५ टक्के लोक रुग्णालयात दाखल होतात. त्यातील फक्त ५ टक्के लोकांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडते. भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येनं रुग्ण बरे देखील होत आहेत.
एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, “आता आपल्याला असं माणून चालायला हवं की आपण ज्यालाही भेटतो तो लक्षणं न दिसणारा कोरोनाचा रुग्ण आहे. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. बाजार, दवाखाना तसेच तुम्ही कुठं फिरायला जात असाल तर हे लक्षात ठेवा की तुमच्या आसपास लक्षणं न दिसणारे कोरोनाचे रुग्ण असू शकतात. भारतात लॉकडाऊन उठवला जातोय, अशा परिस्थितीत तर ही शक्यता आणखी वाढणार आहे.”
जागतिक आरोग्य संघटना याबद्दल काय म्हणतेय?
लक्षणं न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांपासून कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका कमी असल्याचं याआधी जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. या संघटनेच्या अधिकारी मारिया वैन करखोव यांनी जिनिव्हामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, की लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून कोरोना पसरण्याचा धोका फारच कमी आहे. काही देशांनी यासंदर्भात ठोस संशोधन करुन आम्हाला रिपोर्ट पाठवले आहेत.”
मारिया असंही म्हणाल्या होत्या की, “ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत त्यांच्याकडून इतरांना कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका ६ टक्क्यापेक्षा जास्त नाही. आम्ही या प्रकरणावर आणखी लक्ष देत आहोत. काही देशसुद्धा यासंदर्भात आकडेवारी गोळा करत आहेत. ज्यावरुन यासंदर्भात ठोस अशी माहिती समोर येऊ शकेल.”
मारिया म्हणाल्या, कोव्हिड-१९ हा एक श्वसनासंबंधित आजार आहे, जो खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे बाहेर पडणाऱ्या तुषारांपासून पसरतो. फक्त लक्षणं दिसणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं झालं तर त्यांना क्वारंटाईन केलं जावं. संपर्कात आलेल्या लोकांची माहिती काढावी व त्यांनाही क्वारंटाईन करावं, ज्यामुळे हा रोग समाजात पसरण्याचा धोका कमी होईल”
WHOच्या या अधिकाऱ्याने अधिकृतरित्या ज्या रुग्णांना लक्षणं दिसत नाहीत व ज्यांची प्रकृती गंभीर नाही, अशा लोकांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी असल्याचं म्हटलं होतं. मात्र यानंतर मोठा गदारोळ झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं आपलं हे वक्तव्य मागे घेतलं आहे.
संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. मनिष जुठानी यांनी सीएनएनला सागितलं, की कोव्हिड-१९ मध्ये लक्षणं न दिसणारे रुग्ण आणि उशिरा लक्षण दिसणारे रुग्ण दोन ते तीन दिवस आधीपासूनच कोरोना पसरवायला सुरुवात करु शकतात.
यूएस सेंट्रिस डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशनने आपल्या एका अहवालात असं सांगितलं आहे, की कोरोनाच्या ज्या रुग्णांना उशिरा लक्षणं दिसतात, असे ४० टक्के रुग्ण स्वतःला अस्वस्थ वाटण्याआधीच कोरोना पसरवायला सुरुवात करतात. म्हणजेच इतरांमध्ये कोरोना पसरवल्यानंतर अशा लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसतात. जे जास्त धोकादायक आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”
-भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!
-शरद पवारांचा ‘तो’ दावा विनोद तावडेंनी खोडून काढला, म्हणाले…
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणाले…
-“देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार”