लेकीला दोन वेळा आशीर्वाद दिला, यंदा लेकाला आशीर्वाद द्या; धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघ किती प्रतिष्ठेचा ठरणार आहे ते राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे  यांच्या भाषणाने दाखवून दिलंय. ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची निवडणूक आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत त्यांनी विजयी करण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी त्यांची बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. गल्ली ते दिल्ली सत्ता असूनही काही करता आलं नाही, असं ते म्हणाले.

परळीत एवढे प्रश्न असताना महाराष्ट्रातील प्रश्नावर काय बोलावं असा प्रश्न पडतो. परळीने यापूर्वीही 1995 ते 1999 सत्ता पाहिली, सध्याही सत्ता आहे. पण या दहा वर्षांच्या सत्तेत परळी मतदारसंघाला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे.

आपल्या इतिहासात कधी नागापूरचं धरण कोरडं पडलं नाही, पण ते यावर्षी कोरडं पडलं. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की माजलगावच्या धरणातून जायकवाडीचं पाणी वाण धरणातून आणावं. पण माजलगावचं पाणी वाण धरणात येऊ शकलं नाही, धरणाची उंची वाढली नाही. हे आपलं दुर्दैव आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजांवर सडकून टीका केली.

या भागाच्या लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री, ज्यांना दोन वेळा निवडून दिलं, एवढं महत्त्वाचं पद असतानाही, राज्यात, दिल्लीत सत्ता असतानाही आमच्या ताई साहेबांना नागापूरच्या वाण धरणात पाणी का आणता आलं नाही याचं उत्तर कुणी तरी विचारायला हवं, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

मुंडे साहेबांचं ते स्वप्न होतं की परळीत पंचतारांकित एमआयडीसी असावी, उपमुख्यमंत्री झाल्यावर तो प्रयत्नही झाला, तेव्हा एमआयडीसी झाली नाही. कारण, तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, पण या सत्ताकाळात एमआयडीसी का आली नाही, असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला.

महत्वाच्या बातम्या-