शेवटची विकेट पडल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जे केलं ते पाहण्याजोगं आहे

मेलबर्न : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेली ही कसोटी विशेष गाजली ती स्लेजींगमुळे. स्टंपच्या पाठीमागून दोन्ही संघाच्या यष्टीरक्षकांनी जी स्लेजिंग केली ती साऱ्या जगानं ऐकली, त्यामुळे जो संघ विजयी होणार तो भलताच जल्लोष करणार हे नक्की होतं. भारताने तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर तेच झालं. भारतीय खेळाडूंनी जो जल्लोष केला तो पाहण्यासारखा आहे.

भारतात मेलबर्नचं हवामान ट्रेंड का झालं?

पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात होते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मेलबर्नमध्ये पाऊस सुरु होता. भारतीय प्रेक्षकांना त्यामुळे चितेनं ग्रासलं होतं. पाऊस बंद व्हावा यासाठी भारतीय चाहते मनापासून प्रार्थना करत होते. याच काळात भारतात मेलबर्न वेदर नावाचा शब्द ट्रेंडिंगमध्ये होता. याचा अर्थ भारतातील लोकसुद्धा मेलबर्नचं हवामान सारखं सारखं पाहात होते. मेलबर्न कसोटीचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. अखेर पाऊस बंद झाला आणि कसोटीला सुरुवात झाली.

खेळ सुरु झाल्यावर नेमकं काय घडलं?-

कसोटी जिंकण्यासाठी भारताला अवघ्या २ विकेट्सची आवश्यक्ता होती. या दोन विकेट्स घेण्यासाठी भारताला २७ चेंडू टाकावे लागले. एकूण २४ मिनिटांचा खेळ झाला. ऑस्ट्रेलियाला यादरम्यान फक्त ३ धावा करता आल्या तर त्यांच्या शेवटच्या २ विकेट्स पडल्या. पहिल्यांदा बुमराहने पॅट कमिन्सला पहिल्या स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये इशांत शर्माने नॅथन लायन्सला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर भारतीय संघाने जो जल्लोष केला तो पाहण्यासारखा होता. विशेषता विराट कोहलीने केलेला जल्लोष जबरदस्त होता.

पाहा विराट कोहलीच्या जल्लोषाचा व्हीडिओ-

भारताला सर्वात मोठी संधी-

ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात भारत चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यातील तीन कसोटी सामने झाले आहेत. दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे तर एका कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. त्यामुळे कसोटी मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. तिसरी कसोटी ड्रॉ करण्यात जरी भारताला यश मिळालं तरी भारत मालिका खिशात घालू शकतो. यानंतर सिडनी कसोटीमध्ये भारताचं संपूर्ण लक्ष्य विजयावर असणार आहे हे कर्णधार विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे.