भारत आणि चीनच्या सैन्यात का झाला वाद?, घटनास्थळी नेमकं काय काय घडलं???

चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी आलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 सैनिक शहीद झाले. चीनच्या सैन्याने एका मोठ्या षडयंत्रांतर्गत भारताच्या सैनिकांवर फसव्या पद्धतीने कसा हल्ला केला? जाणून घ्या…

नियंत्रण रेषेवरील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, की 15 जून रोजी सीमा भागात सुरु असलेली चीनी सैन्याची जमवाजमव कमी होईल. चीनी सैन्य गलवान प्रदेशातील आपल्या हद्दीत परत जाईल. 16 जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी चीनी सैन्य माघार घेईल, यावर दोन्ही बाजूंनी आधीच सहमती दर्शवण्यात आली होती.

करार तर झाला मात्र यासंदर्भात चीनच्या बाजूने कुठलीही हालचाल झाली नाही. भारतासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार होता, त्यामुळे भारतीय सैन्यानं यासंदर्भात एक पाऊल पुढं टाकलं.  16 बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी चीनसोबत बोलणी करण्यासाठी गेली. चर्चेदरम्यान चिनी सैन्य माघार घेण्याच्या मन: स्थितीत दिसत नव्हते, माघार घेण्यासंदर्भात त्यांची टाळाटाळ सुरु होती.

अशी माहिती आहे, की यानंतर चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना वेढलं आणि लाठ्या-काठ्या, दगड तसेच धारदार तारांच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला झाला त्यावेळी भारतीय सैन्याच्या तिप्पट चीनी सैन्य तिथं होतं, अशा परिस्थितीतही अचानक झालेल्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

दोन्ही बाजूने झालेला हा संघर्ष तब्बल 3 तास सुरु होता. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना गंभीर दुखापत झाली. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतीय सैनिकांची दुसरी टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी चीनच्या या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्य दलाच्या या पलटणीनं चीनी सैन्याचं मोठं नुकसान केल्याची माहिती आहे.

वृत्तसंस्था ‘एएनआय’च्या म्हणण्यानुसार या हिंसक चकमकीत 43 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तथापि चीनने अद्याप हे मान्य केलेलं नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानीही उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. लडाखमधील ढासळती परिस्थिती पाहता सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी आपला पठाणकोट दौरा रद्द केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनकडून अधिकृत निवेदन

-मुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….

-बदला घ्या, सैनिकांचं बलिदान वाया जाता कामा नये- असदुद्दिन ओवैसी

-सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

-सुशांतच्या आत्महत्येनंतर सैफने सांगितली लेकीची अवस्था, म्हणाला…