पुणे | गेल्या काही महिन्यांपासून जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा फटका ज्या शहरांना मोठ्या प्रमाणात बसला आहे, त्या शहरांपैकीच पुणे हे एक शहर आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोनाबाधितांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विवाहाच्या ठिकाणी तसेच गर्दी होणाऱ्या समारंभाच्या ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत.
लग्न समारंभाला आता फक्त 50 लोकांची परवानगी देण्यात आली असून यामध्ये भटजी, वाजंत्री, आचारी, मदतनीस अशा सर्वांची गणना केली जाणार आहे. तसेच विवाह समारंभात जेवण करत असतानाही काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
लग्नात जेवण करताना सुरक्षित वावर राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत. लग्नात जेवण करण्याच्या ठिकाणी सहा सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. तसेच जेवण करताना तोंडाचे मास्क काढल्यानंतर नागरिकांनी एकमेकांशी बोलू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.
विवाहापूर्वी विवाह समारंभात उपस्थित राहणाऱ्या लोकांची यादी तसेच विवाहानंतर त्याच्या चित्रीकरणाची सीडी पाच दिवसांच्या आत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये जमा करणे बंधनकारक केलं आहे. विवाह समारंभाच्या ठिकाणी कार्यालयाचे मालक आणि व्यवस्थापकांनी कोणत्या सुविधांची व्यवस्था करावी, यासाठीही काही सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समारंभाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर, स्वाक्षरी आणि पत्ता लिहून घेणं बंधनकारक आहे. तसेच विवाहासाठी येणाऱ्या नागरिकांच्या शरीराचं तापमान आणि सॅनिटायझरची व्यवस्था उपलब्ध करून देणं बंधनकारक केलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात नियमांच उल्लंघन होणार नाही यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस यांचंही भरारी पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्यानं घालून दिलेल्या या नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच कार्यालयाचाही परवाना रद्द करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न
सुशांतला ही गोष्ट देण्यात आली होती?; एम्सच्या मेडिकल टीमला संशय
पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!
काय सांगता! ‘या’ चित्रपटासाठी सुशांतनं घेतलं होतं फक्त 21 रुपये मानधन!
रियाची कसून चौकशी सुरु!; NCBनं रियाला विचारले ‘हे’ 22 महत्त्वाचे प्रश्न