…म्हणून तब्बल 21 वर्षांनंतर निखिल वागळेंनी सोडला ‘सुटके’चा निश्वास!

मुंबई | दररोज संध्याकाळी 9 वाजता ‘आजचा सवाल’ म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांना भांडावून सोडणारा, सर्वसामान्यांच्या बाजूने बोलणारा निर्भीड आवाज, अशी ओळख अणारं व्यक्तिमत्व म्हणजे निखिल वागळे. त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत अनेक मुलाखती घेतल्या. महाराष्ट्राने ‘ग्रेट भेट’ सारखा त्यांचा मुलाखतीचा कार्यक्रम तर अक्षरश: डोक्यावर घेतला. त्यांच्या ‘आजचा सवाल’ य़ा कार्यक्रमात त्यांनी कित्येक राजकारण्यांचे धाबे दणाणून सोडले. बडे बडे नेते त्यांच्या याच आक्रमक स्वभावामुळे त्यांना घाबरून असतात. यांच्या या आक्रमक स्वभावाचा फटका त्यांना अनेक वेळा बसला आहे. कधी त्यांच्यावर राजकीय पक्षांचे हल्ले झाले आहेत, तर कधी धमकीचे फोन. मात्र ‘दुध पोळल्यावर फुंकून पिणार ते निखिल वागळे कसले’ ???

नेमका का दाखल झाला होता निखिल वागळेंवर खटला??

21 वर्षांपूर्वी ब्रेबाॅर्न मैदानावरची खेळपट्टी शिवसैनिकांनी उखडली होती.  आपल्या स्वभावाप्रमाणे शिवसेनेच्या या दादागिरीचा विरोध करण्यासाठी निखिल वागळे, हुसेन दलवाई, संतोष शिंदे, अबू आजमी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर आंदोलन केलं होतं. त्यामुळे या सर्वांवर पोलिसांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.

पोलिसांनी यावेळी नेमका काय पवित्रा घेतला होता ??

ब्रेबाॅर्न मैदानावरची खेळपट्टी शिवसैनिक उखडत होते. त्यावेळी आंदोलन करण्यासाठी निखिल वागळे, हुसेन दलवाई, संतोष शिंदे, अबू आजमी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. हे आंदोलन झाल्यावर निखिल वागळे आणि त्यांच्या साथिदारांना घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आले. निखिल वागळेंसह अनेक जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी यावेळी त्यांना अटक केली.

निकाल लागल्यावर वागळेंचं काय म्हणणं आहे??

मी माझ्या आयुष्यात आजवर एवढी निदर्शने केली पण आजपर्यंत कोणीही माझ्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिसांनी माझ्यावर घातलेली माझ्या आयुष्यातील ही पहिली केस आहे. मी पोलिस ठाण्यात हल्ला केला, गोंधळ घातला, डीसीपींना धक्काबुक्की केली, काचा फोडल्या असे खोटे आरोप माझ्यावर करून गुन्हा दाखल केला. माझ्यासह दलवाई, आझमी आणि शिंदेंनाही या खटल्यात गोवण्यात आलं. मात्र आम्ही शांततेत निदर्शने केली होती. कोणतेही गैरवर्तन केले नव्हते, हे कोर्टाला पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आम्ही पोलिस आणि डीसीपींच्या विरोधात लिहिलं म्हणून सुडबुद्धीने पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली, असा आरोप निखिल वागळे यांनी केला आहे.

२१ वर्षानंतर वागळे, दलवाई यांची निर्दोष मुक्तता-

21 वर्षांनंतर या खटल्यातून पत्रकार निखिल वागळे, खासदार हुसेन दलवाई, आमदार अबू आझमी आणि संतोष शिंदे यांची माझगावच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आणि महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे निखिल वागळे यांनी स्वागत केले आहे.