सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. मनसेनं यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. सांगलीतील मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी हे पत्र लिहिलं आहे.

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आखली आणि त्याअंतर्गत अनेक शेतकरी बांधवांची कर्जमाफी झालीही. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचं आढळून आल्याचं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

काही जणांचा शेतीशी संबंध नसतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत. तसेच ज्यांनी कर्जमाफी मागितलीच नाही त्यांच्या खात्यातही रक्कम जमा झाल्याचं कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कर्जमाफी योजनेतून शासकीय नोकरदारांना वगळण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. असं असतानाही शासकीय सेवेत असलेल्यांच्या बॅंक खात्यातही कर्जमाफीची रक्कम आलेली आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की कर्जमाफी योजनेतील गैरव्यवहाराची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश आपण संबंधित यंत्रणांना द्यावेत आणि कर्जमाफीची रक्कम खऱ्या गरजू शेतकऱ्यांच्याच बॅंक खात्यात जमा होईल, यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असं कीर्तिकुमार शिंदे यांनी पत्रात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

-‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

-जनाची नाही पण मनाची असेल तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे पाटील

-रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय

-कामगारांचा पोटाचा प्रश्न सोडवण्याठी बीग बी अमिताभ बच्चन यांचा पुढाकार