प्रकाश आंबेडकर विद्वान व्यक्ती; आपण सुखाने एकत्र नांदूयात- छत्रपती संभाजीराजे

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सुनावणीला खुद्द खासदार संभाजीराजे यांनी नवी दिल्लीतल्या सर्वोच्च न्यायालयात हजेरी लावली. सुनावणी झाल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणाच्या प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाच्या बाजूने उभं रहावं ही माझी त्यांना विनंती आहे, असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर ही विद्वान व्यक्ती आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत. जसं शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकत्र येत समाजाच्या भल्यासाठी काम केलं, तेच काम आपण करूयात, असं संभाजीराजे म्हणाले.

शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांनी जसं आरक्षणावर काम केलं. त्यांची त्यात इतकी निखळ मैत्री झाली. पुढे शाहू महाराजांनी वंचितांना 50 टक्के आरक्षण दिलं. आणि तश्याच पद्धतीचं आरक्षण डॉ. आंबेडकरांनी घटनेत दिलं. हेच काम आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाने 27 जून रोजी मराठा आरक्षण वैध असल्याचे सांगत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला होता. दरम्यान, आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे.