‘नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र’; राष्ट्रवादी युवकचे थाळीनाद आंदोलन

जळगाव | वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या आणि फडणवीस सरकारच्या विरोधात थाळीनाद आंदोलन केले. आज त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे हे देखील यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे हे बेरोजगारीविरोधातील नववे विभागीय आंदोलन ठरले. 

नोटाबंदी मुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. अनेक उद्योग देशोधडीला गेले आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रातील शासनाच्या १९ कंपन्या बंद झाल्या असून राज्यातील अनेक छोटे मोठे उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडून सुमारे ३० लाखाहून अधिक लोकं बेरोजगार झाली आहेत. म्हणून आम्ही उदासीन असलेल्या सरकारच्या विरोधात थाळी नाद आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहोत, असं राष्ट्रवादी युवकने सांगितलं.

दरम्यान, इथून पुढच्या काळात देखील या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलनं करू, असंही राष्ट्रवादी युवकने सांगितलं.