मुंबई | लॉकडाऊमुळे मुंबई आणि पुण्यात अनेक मजूर अडकून पडले आहेत. आपापल्या घरी जाण्याचे त्यांना वेध लागले आहेत. अशावेळी त्यांच्या प्रवासासंबंधी निर्णय घेताना शासनाचा जरासा गोंधळ उडलेला पहायला मिळत आहे. याप्रकरणीच भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.
राज्य सरकारने एकदाच काय ते मुंबईमध्ये राहणारे चाकरमानी यांच्याबदल धोरण निश्चित करावे.. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म.. कधी नाव मागितली जात आहेत.. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत.. त्यामुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत. सरकार नी उशीर होणाया आधी स्पष्टीकरण द्यावे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राज्य शासनाच्या सुधारित नियमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयावरच प्रशासनाने एक काय ती भूमिका जाहीर करावी. नागरिकांना गोंधळात टाकू नये, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.