शिवसेनेचे किमान 15 आमदार फुटणार; शिवसेना आमदाराचाच धक्कादायक दावा

पंढरपूर : ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे वगळता विधानसभेतील एकाही आमदाराला शिवसेनेने मंत्रिपद दिलेलं नाही. फक्त आपल्या जवळच्या माणसांनाच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदं दिली आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे किमान 15 आमदार तरी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. 

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप पाटील चिखलीकर बोलत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंडखोरी करत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. शिवसेनेचे बंडखोरी करण्याची शक्यता असलेले सर्व आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा देखील चिखलीकर यांनी केला आहे. 

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून 6 आमदार असून एकालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. तसेच नांदेडमध्ये सुद्धा पक्षाचे 4 आमदार असून एकालाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. या आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असं चिखलीकर यांनी सांगितलं.