“पिकांचे भाव माहित नसतात मात्र गांजाचे भाव बरोबर माहित असतात”

अहमदनगर | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. रोज उठून नवाब मलिक नवनवीन गौप्यस्फोट करत आहे. रोज आरोपांचं सत्र लावलं आहे. त्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांची मालिका रोजच पहायला मिळत आहे.

मुंबई क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आलं होतं. त्याच्या अटकेनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरच आरोपांची झोड सुरु झाली. याप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उडी घेत वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर या प्रकरणानं आणखीनच पेट घेतला.

आता नवाब मलिक यांच्यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. पाथर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुजय विखेंनी मलिकांना लक्ष केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.

पाथर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखेंनी शेतकरी अनुदानाविषयी बोलताना नवाब मलिकांवर आणि आघाडी सरकारवर टीका केली. रोज टीव्हीवर येणाऱ्या मंत्र्यांना शेतीत काय पिकतं हेही माहित नसतं. त्यांना पिकांचे भावही माहित नसतात. मात्र सध्या बाजारात गांजा काय भावानं मिळतो हे बरोबर माहित असतं, असं म्हणत सुजय विखेंनी मलिकांवर खोचक टीका केली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, भाजप कार्यकर्त्यांच्या घरी छापा टाकल्यावर कांदा, सोयाबिन, तूर आणि इतर पिके सापडतील. मात्र यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री उठसूट टीव्हीवर येत आहेत.

फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा अशी टीका विखे यांनी मलिक यांचं नाव न घेता केली आहे. आता नवाब मलिक सुजय विखेंनी केलेल्या खोचक टीकेवर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवाब मलिक यांनी काही दिवसांपासून रोजच पत्रकार परिषद घेत आहे. रोज नवा खुलासा करत आहेत. त्यामुळे मलिक आज काय गौप्यस्फोट करणार, आज कोणावर आरोप करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून असतं.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरण आता हळूहळू मलिक-फडणवीस यांच्या वादावर येऊन थांबलं आहे. दोघेही एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद