मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!’ या शीर्षकाखाली सामनामध्ये अग्रलेख लिहीत विखेंवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी राऊतांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
प्रति, श्री संजय राऊत… (कार्यकारी संपादक दैनिक सामना)
थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही.
बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का ? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील.
तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच. मी भाजपमध्ये आनंदी आहे पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष?
थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावा! -आपला, राधाकृष्ण ए. विखे पाटील
महत्वाच्या बातम्या-
-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचं शेतकऱ्यांना ‘हे’ कळकळीचं आवाहन
-मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!
-संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार
-अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी
-चीनी कंपन्यांसोबतचे करार ठाकरे सरकारने रद्द केले नाहीत तर….; सरकारकडून स्पष्टीकरण