अरविंद बनसोड आणि काही दलितांवर अत्याचार झालेत, सरकारने न्याय द्यावा- संभाजीराजे

कोल्हापूर | अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असं मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे याविषयीचं आपलं मत मांडलं आहे.

राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने मला अजून एक गोष्ट नमूद करायची आहे, की या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे. बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत असल्याचे दिसून येत आहे. यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणून चौकशी अंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ अन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे, असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

ज्या प्रमाणे मराठा समाजाने दलितांवर अन्याय केला नाही पाहिजे असे आम्ही म्हणतो, त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे. कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा तात्काळ विरोध मी नेहमी केला आहे आणि करत राहणार.. काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग?
त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे, अशी अपेक्षा सरतेशेवटी त्यांनी व्यक्त केले.

दुसरीकडे राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील  दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये, असं देशमुख म्हणाले.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-ICICI व्हेंच्युअरतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत, उद्धव ठाकरेंनी मानले आभार

-पुढच्या निवडणुकीत 100 जागा पार करायच्या; पक्षाच्या वर्धापनदिनी निर्धार

-पवारसाहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे, बापाला मुलाचं ज्ञान कमीच वाटतं- देवेंद्र फडणवीस

-अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत- गृहमंत्री

-“अहो, कोथरूडचे उपरे पाटील….. शरद पवारांना संकटकाळात जाग असतेच”