योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत

मुंबई |  सध्या श्रमिकांना कोणीच वाली उरलेला दिसत नाही. आज या हिंदी भाषिकांसाठी त्यांच्या राज्याचे दरवाजे बंद केले गेले आहेत. सीमेवरूनच परत जा, अशी अरेरावी त्या त्या राज्यांनी केली हे बेईमानीचेच लक्षण म्हणावे लागेल. पालघरमधील साधू हत्याकांडाइतकाच हा प्रकार निर्घृण आणि अमानुष आहे. व्होट बँकेचा कचरा आता कोणालाच आपल्या अंगणात नको आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत जो ‘यू टर्न’ घेतला आहे तो माणुसकीस धरून नाही, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून योगी सरकारला फटकारलं आहे.

आपल्याच लोकांशी असे क्रूरपणे वागणे कोणालाच शोभत नाही. सोप्या मराठी भाषेत त्यास बगला वर करणे म्हणतात, असा टोला त्यांनी योगी सरकारला लगावला आहे. तर उत्तर प्रदेश प्रशासनाने अशा बगला वर केल्याने 30-35 लाख हिंदी मजूरवर्गाच्या जीवाची तडफड सुरू आहे, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले आहे.

उत्तर प्रदेश-बिहारचे सर्वाधिक मजूर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत राहतात. हा आकडा 25-30 लाखांच्या घरात असावा व या लाखो लोकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी झुंबड उडवली आहे. सुरत येथे तर उत्तर प्रदेशातील हजारो मजूर रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. मुंबईतही वेगळी परिस्थिती नाही, पण या लाखो श्रमिकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वगृही घ्यायला तयार नाहीत. या सर्व श्रमिकांच्या कोरोना चाचण्या करा आणि नंतरच त्यांना पाठवा, अशी आडमुठी भूमिका घेऊन योगी सरकारने आपल्याच लेकरांना संकटकाळी लाथाडले आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश , बिहार, ओडिशा, आंध्र अशा राज्यांतला मजूरवर्ग देशात पसरलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातेत तो सर्वाधिक आहे. कालपर्यंत हा मजूरवर्ग म्हणजे अनेक राजकीय पक्ष व पुढार्‍यांची ‘व्होट बँक’ बनली होती व जणू मुंबई-महाराष्ट्र यांच्याच श्रमातून उभा राहिला अशी बतावणी सुरू होती. आता या मुंबईचे उपरे मालक संकटकाळी पलायन करीत आहेत व त्यांचे राजकीय मालक-पालक तोंडात मास्कचे बोळे कोंबून घरातच बसले आहेत. या श्रमिकांना आता कोणीच वाली उरलेला दिसत नाही, असंही राऊत यांनी आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारनं लॉकडाऊन केला… उद्धव ठाकरेंनी आधार दिला…; ऐका थेट उसाच्या शेतातून कोरोनावरचं गीत

-कोरोनाला हरवायचंय, पाहा WHO ने काय सांगितलाय जालीम उपाय

-लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”

-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र