“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचा असेल हे आम्ही खात्रीने सांगतो”

मुंबई |  महाराष्ट्रातला विरोधी पक्ष कोरोनाच्या कठीण काळात राजकारण करतोय, असा आरोप ठेवत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपवर सडकून टीकास्त्र सोडलंय.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने असे ठरवले आहे की, सरकारविरोधात आपल्या तोंडाचा ताशा वाजवत ठेवायचा, लोकांत संभ्रम निर्माण करायचा, राज्य सरकार कसे अपयशी ठरत आहे व जनता कशी वार्‍यावर पडली आहे अशी बदनामी करायची. हे सर्व करीत राहिल्याने ‘ठाकरे सरकार’ कोलमडेल व आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. विरोधी पक्ष त्यादृष्टीने भ्रमात आहे. असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास हा किमान 14 वर्षांचाच असेल हे आम्ही खात्रीने सांगू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाचे मागणे आहे की, राज्य सरकारनेही एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्य सरकारने वेगळे पॅकेज जाहीर करावे याचा अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज पोकळ आणि कुचकामी आहे. केंद्र सरकारने हे पॅकेज संपूर्ण देशासाठी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या पॅकेजची तुलना ‘रिकाम्या खोक्या’शी केली आहे. ‘खोका रिकामा’ व नेहमीप्रमाणे जाहिरातबाजीच जास्त. जाहिरातीचा मेकअप करण्यापेक्षा आता प्रत्यक्ष काम करणे गरजेचे आहे व महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात काम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

गुजरात राज्य हे पंतप्रधान आणि केंद्रिय गृहमंत्र्यांचे गृहराज्य आहे. कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयानेच मारले आहेत. शेजारच्या भाजपशासित राज्यांतील दुरवस्था पाहिली तर महाराष्ट्राने पुकारलेले कोरोना युद्ध अपयशी ठरणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालये गेल्या दोन महिन्यांत उभी केली आहेत त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची कल्पना येईल, असा सल्ला राऊत यांनी विरोधी पक्षााला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

-महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तर द्या- रोहित पवार

-कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

-“योगीजी, कामगार-मजूरांना ‘आई’ सांभाळत नाही म्हणून ‘मावशी’कडे येतात”

-फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं