मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

मुंबई : मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढून टाकलं, असं माजी आमदार आणि राज्याच्या माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीव्ही 9 या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2004 साली जाहीरनामा जारी केला होता. त्या जाहीरनाम्याप्रमाणेच मी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मराठा समाजाचा मला खूप चांगला पाठिंबा मिळत होता. त्यावेळी शरद पवार यांनी काहीही न सांगता मला पक्षातून काढून टाकलं. शरद पवार यांनी एकप्रकारे माझा आवाज बंद केला. त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला असता तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या. 

दरम्यान, शरद पवार सध्या मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत, मात्र असं असलं तरी ते किती दिवस या मुद्द्यावर ठाम राहतील? हे काही सांगता येत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे त्यामुळे मला ही गोष्ट माहीत आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

“शरद पवारांनी मला त्यावेळी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. मात्र त्यांनी माझा आवाज बंद केला. आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती. जीवही गेले नसते- शालिनीताई पाटील