शेतकऱ्यांच्या आत्महत्या अस्वस्थ करणाऱ्या- शरद पवार

अहमदनगर : शेतीवरील बोजा वाढत असून जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाही असा एकही दिवस जात नाही. हे सारं अस्वस्थ करणारं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला गुरुवारी भेट दिली. त्यानंतर विद्यार्थी व संशोधकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कष्ट करून भुकेचा प्रश्न सोडवला. पूर्वी गहू आयात करावा लागत होता,पण मी केंद्रात कृषिमंत्री झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग याच्याकडे पाठपुरावा करून शेतीसाठी जादा निधीची तरतूद केली. त्यामुळे जगात गहू, तांदूळ, दूध याचं सर्वाधिक उत्पादन करणारा देश भारत बनला, असं पवारांनी सांगितलं आहे.

देशातील शेतकरी हा मेहनती आहे. त्याला मालाला किंमत देऊ न त्याला जगावावे, त्याचा सन्मान करावा, त्याला घामाची किंमत द्यावी, शेतकरी अडचणीत येणार नाही असे निर्णय घ्यावे, असं पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात तरुण मुले आता शेतीत लक्ष घालत आहेत. ही चांगली बाजू आहे. एका बाजूला सांगली व कोल्हापुराला महापूर आहे,तर दुसरीकडे दुष्काळ आहे. पाण्याचा थेंब न थेंब अडविला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.