इंग्रज नसते तर भारतावर आज छत्रपतींचं शासन अन् मराठ्यांचं राज्य असतं- काँग्रेस नेते शशी थरूर

मुंबई | काँग्रेसचे तल्लख बुद्धीमत्तेेचे नेते म्हणून ओळखले जाणारे शशी थरूर आपल्या अभ्यासपूर्ण आणि मुद्देसुद भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर त्यांच्या भाषणाचे जगभरात चाहते आहेत. त्यांचं असचं एक भाषण सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

इंग्रज भारतात आले नसते तर भारतावर मराठ्यांनी राज्य केलं असतं, असं वक्तव्य एका भाषणादरम्यान शशी थरूर यांनी केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय.

केरळमधील तिरूवअनंतपुरम येथे मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टीवल ऑफ लेटर्स या कार्यक्रमात शशी थरूर यांनी भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी विद्यार्थीनीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना इतिहासाची पाने उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला.

जर व्यापारी बनून आलेले इंग्रज भारतात आलेच नसते तर भारत आजच्या सारखाच राहिला असता का? असा प्रश्न विद्यार्थीनेने विचारला होता. त्यावर शशी थरूर यांनी तत्कालिन इतिहासाचे दाखले देत इंग्रज नसते तर भारतावर आज छत्रपतींचं शासन अन् मराठ्यांचं राज्य असतं, असं म्हटलं.

मराठ्यांच्या सामाज्र फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादेत नव्हतं तर मराठ्यांचं साम्राज्य पार दिल्लीपर्यंत होतं, असंही थरूर यांनी म्हटलं.

मी जेव्हा जगाच्या आणि भारताच्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा भारतीय उपखंडावर मराठ्यांचेच नियंत्रण होते. तेच कारभार पाहत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांमधील महान राजे होते, असे गौरवोद्गार देखील थरूर यांनी काढले.