‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

मुंबई | राज्यात पाच दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना चांगलंच डिवचलं. आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलनाला बसलेल्या नितेश राणेंनी म्याऊ म्याऊ च्या घोषणा देत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

नितेश राणे यांच्या घोषणाबाजीमुळे भाजप नेत्यांमध्ये हशा पिकला पण राजकीय वातावरणात चांगलीच गरमा गरमी पाहायला मिळाली. अधिवेशनात घडलेल्या या प्रकारावरून शिवसेनेने आता प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे विधानपरिषद आमदार डॉ. मनिष कायंदे यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. कायंदे यांनी ट्विट करत नितेश राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.

‘मांजर आडवे गेले तरी थांबू नये ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री मा.आदित्यजी ठाकरे यांनी तंतोतंत पाळली’, असं ट्विट करत कायंदे यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपने अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरलं. म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरण, टीईटी, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी आंदोलन यासारख्या अनेक मुद्द्यांवरून भाजपने सरकारला घेरलं.

दरवर्षी नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन यंदा पहिल्यांदाच मुंबईत भरवण्यात आलं आहे. पहिल्या दिवसापासूनच अनेक मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.

भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. नितेश राणेंच्या टोल्याला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली यावरून राणे विरूद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज