“हा नवा भारत आहे, इथं आडनावाला महत्व नाही”

नवी दिल्ली | हा नवा भारत आहे, येथे तरुणांच्या आडनावाला महत्त्व नाही. तर आपलं नाव सिद्ध करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून नवा भारत विषयावर आपलं मत मांडलं आहे.

हा नवा भारत आहे जिथे तरुणांचं आडनाव काय आहे यामुळे फरक पडत नाही. तर आपलं नाव सिद्द करण्याच्या क्षमतेला महत्त्व आहे. काही मोजक्या लोकांचा नाही तर प्रत्येक नागरिकाचा आवाज ही नव्या भारताची ओळख आहे. नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

भाषेचा फायदा घेत अनेकांनी भारतात स्वार्थापोटी विभागणी करत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची खंत नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, भाषेतही ताकद असून त्याचा वापर करत आपण सर्वांना एकत्र आणलं पाहिजे, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.