भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा झपाट्यानं वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत भारत चौथ्या स्थानावर जाऊन पोहचलाय. आरोग्य प्रशासन व सरकार कोरोना विरूद्ध जिकीरीनं लढत असताना, नवीन आव्हानं मात्र कमी होताना दिसत नाहीत. आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या यादीत आणखी नव्या दोन लक्षणांचा समावेश केलाय. नागरिकांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, तोंडाची चव जाणं व कसलाही वास घेता न येणं ही कोरोनाची नव्या स्वरूपाची लक्षणं आहेत. वैज्ञानिक भाषेत याला अनुक्रमे एनोस्मिया व एगिसिया असं म्हणतात. या प्रकारच्या लक्षणांमुळं कोरोना संक्रमित झालेले बरेच रूग्ण आढळून आले होते.
चव जाणं, वास न येणं अशी लक्षणं आढळून आल्यास कोरोना संक्रमणाचा धोका असतो हे एव्हाना सगळीकडे चर्चेत होतं. मात्र सरकारकडून यावर निर्णय झाला नव्हता. आता सरकारनंच अधिकृतपणे कोरोनाच्या यादीत या नव्या लक्षणांची भर घातली आहे.
कोरोना व्हायरस विरोधातील ‘नॅशनल टास्क फोर्स’ची बैठक नुकतीच पार पडली. जिभेची चवं जाणं, नाकाला वास न येणं यांचा कोरोनाच्या प्राथमिक लक्षणांत समावेश करायचा की नाही. यावर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. अमेरिकेतील Center For Disease Control and Prevention( CDC) संस्थेनं याआधीच या लक्षणांची कोरोनाच्या संक्रमण यादीत नोंद केली होती.
ताप, खोकला, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार, घसा दुखणे इ. कोरोनाची लक्षणं मानली जातात. मात्र सिडीसीच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमण झाल्यावर अनेक रूग्णांच्या तोंडाला चव नसल्याचं आढळून आलं. अनेक रूग्णांना तर वासही ओळखू येत नव्हता. म्हणून या लक्षणांचा कोरोना संक्रमणाच्या सूचीत समावेश करणं गरजेचं होतं.
या नव्या स्वरूपाची लक्षणं आढळून आल्यास, बाधित व्यक्तीनं त्वरित कोरोना चाचणी करणं गरजेची आहे. कारण काही रूग्णांना खोकला, ताप इ. कसलीच प्राथमिक लक्षणं आढळून न येता, या नव्या स्वरूपाच्या लक्षणांची लागण झाली. या रूग्णांची तपासणी केली असता, कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आल्याचं निदर्शनात आलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नुकतंच महत्वाचं भाष्य केलं होतं. कोरोनाची कसलीही लक्षणं न आढळलेल्या रूग्णांपासून कोरोना संक्रमणाचा धोका हा केवळ ६ टक्के इतका आहे. यामुळे ही नव्या स्वरूपाची लक्षणं आढळून आल्यास घाबरून जाण्याचं कारण नाही.
महत्वाच्या बातम्या-
-सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल