मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतू गोपाळ शेट्टी यांनी उर्मिलाचा जवळपास 4 लाखांनी धुव्वा उडवला. उर्मिलाने आपल्या पराभवाला काँग्रेस नेते आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. ती पदाधिकाऱ्यांच्या वागण्यावर नाराज आहे. उर्मिला काँग्रेसला बाय बाय करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती कळतीये.
16 मे रोजी तत्कालिन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना उर्मिलाने पत्र लिहित आपल्या मनातली खदखद व्यक्त केली होती. हेच 9 पानी पत्र वेगाने व्हायरल होत आहे. या पत्रात तिने मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचारात अजिबात सहकार्य केले नाही. उलट सासत्याने ते पैशांची मागणी करत राहिले, असा धक्काकायक आरोप तिने केला आहे. तसेच या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसने कडक करवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस, लाथाळ्या आणि बिनकामाच्या उचापती यामुळे उर्मिला काँग्रेसचा हात झिडकारणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.