“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराचं पाणी ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर पूरग्रस्तांपुढं आ वासून उभा ठाकला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतून काँग्रेसची उमेदवार राहिलेली मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेली आहे. उर्मिलाने सांगली आणि कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे सरसावलेला एक हात हा जास्त महत्वाचा असतो! महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत! पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा यापासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित, अशा भावना उर्मिलाने ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हीडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या.

कोल्हापूर, सांगली, कोकण, गडचिरोलीमध्ये पुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. खरा तो प्रेमचि धर्म जगाला प्रेम अर्पावे, अशी शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या महाराष्ट्रातील आपण मुलं आहोत. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आपण सर्वांनी पुढे सरसावायला पाहिजे, असं आवाहन उर्मिलाने केलं आहे.

या वर्षीचा स्वातंत्र्यदिन पूरग्रस्तांच्या नावाने करुया, असं म्हणत उर्मिलाने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यासारख्या बॉलिवूडमधील मराठमोळ्या कलाकारांसह अमिताभ बच्चन, अक्षय कुमार अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. 

राज्य सरकारसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी, अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यासारख्या मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.  

 

 

महत्वाच्या बातम्या-

-राजस्थानमध्ये पोषण आहारातून 36 मुलांना विषबाधा

-पूरग्रस्त भागात शरद पवार स्वातंत्र्यदिन साजरा करणार

-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की फडणवीस???”

-टी-20 विश्वचषकात दिव्यांगांनी मिळवून दिलं भारताला विश्वविजेतेपद

-प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!