भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. आता एक मेसेज फक्त 5 जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आजपासून भारतात हा नियम लागू केला आहे.
फेक मेसेजेस फॉरवर्ड केल्यानं गदारोळ माजू शकतो, हे अलिकडच्या काळात दिसून आलं आहे. त्यामुळं ‘फेक मेसेजेस’ला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपनं भारतातील वापरकर्त्यांवर निर्बंध घातले आहे. भारतात जवळपास 20 कोटी वापरकर्ते असून सगळ्यांना हे बंधन घालण्यात आलं आहे.
केंद्र सरकारनं फेक मेसेजसंदर्भात व्हॉट्सअॅपला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपनं भारतात मॅसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा ठरवण्यासाठी चाचणी घेतली.
व्हॉट्सअॅपकडून वापरकर्त्यांना याबद्दल माहिती मिळावी यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच मेसेज फॉरवर्ड करताना विचार करूनच फॉरवर्ड करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.