“मी विमान पाठवतो, तुम्ही स्वत: या आणि काश्मीरमधील परिस्थिती बघा”

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 वरुन काँग्रेस-भाजपमध्ये अद्यापही शाब्दिक युद्ध सुरुच आहे. काश्मीरमधील परिस्थितीवरुन भाजपला लक्ष्य करणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल यांनी काश्मीर खोऱ्याचा दौरा करावा. परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यासाठी आम्ही विशेष विमान पाठवतो, असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्ये काय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर मलिक यांनी राहुल गांधींना प्रत्युतर दिलं.

सांप्रदायिक दृष्टीकोनातून कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. त्यामुळे मी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. त्यासाठी मी विमानदेखील पाठवेन. तुम्ही स्वत: परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि मगच बोला. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात. त्यामुळे अशा प्रकारची बेजबाबदार विधानं तुम्हाला शोभत नाहीत, असं मलिक म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोदींनी पारदर्शकपणा दाखवून या प्रकरणी चिंता व्यक्त करायला हवी, अशी मागणी राहुल यांनी शनिवारी केली होती. कोणत्याही सांप्रदायिक दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आलेलं नाही. कलम 35 ए आणि कलम 370 मधील बहुतांश तरतुदी सर्वांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी काल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली होती. जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पक्षाने काढला नसता, असे पी. चिदंबरम म्हणाले होते. भाजपने बळाच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केला. 

काश्मीरमधील परिस्थिती निवळल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमं काश्मीरमधील अस्थिरतेचं वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-बालपणापासूनच्या ते गेल्या 18 वर्षापर्यंत मोदींनी सांगितल्या ‘या’ सगळ्या गोष्टी

-कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

-अमित शहा स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी जाणार?

-तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमदाटी

-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत