“तिकीट वाटपाचं राहु द्या बाजूला; मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी जरा पुण्यातील पूरस्थितीकडे बघावं”

मुंबई : पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल पण आधी पुण्यातली परिस्थिती नीट हाताळा, असा टोला छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. 

सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळीही सत्ताधारी तिथे गेले नाही, असं म्हणत छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यावर आणि चंद्रकात पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही. तिकीट वाटपाची चर्चा दोन दिवसांनी झाली तरी काहीही बिघडणार नाही, असंही छगन भूजबळांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. पावसाने पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढलं.

महत्वाच्या बातम्या-