कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा-कॉलेज उघडू नका, कपील पाटलांचं मुख्यमंत्री अन् शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई | WHO च्या रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी काढलेलं फर्मान आणि जुलैपासून शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले फर्मान ताबडतोब मागे घेण्यात यावे, अशी विनंती करणारं पत्र शिक्षक आमदार कपील पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लिहिलं आहे.

शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणं धोकादायक ठरू शकेल, असं मत कपील पाटील यांनी नोंदवलं आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्त झाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन, टीव्ही, वर्कबुक, ऍक्टिव्हिटी बुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पर्यायांचा विचार करण्याची सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केली असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.

बंगळुरूच्या The National Institute of Mental Health and Neuro-Sciences (Nimhans) ने जाहीर केलं आहे की, मोबाईल किंवा ऑनलाईन शिक्षण देणे हे मुलांच्या आरोग्यास घातक आहे. ही बाब लक्षात घेता अनेक खाजगी शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या माऱ्याला ताबडतोबीने वेसण घालणं अत्यंत आवश्यक असल्याचं पाटील म्हणाले.

तसंच राज्यातील 15 टक्के घरात साधा टीव्ही सुद्धा नाही आणि स्मार्ट फोनही 40 टक्के घरात नाही. ही बाब लक्षात घेता वर्कबुक आणि ऍक्टिव्हिटी बुक हाच पर्याय योग्य ठरू शकतो. जुलै अखेरपर्यंत वर्कबुक आणि ऍक्टिव्हिटी बुक तिमाही पद्धतीने छापून ती राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत घरपोच देण्यात यावीत. जेणेकरून शिक्षकांना त्याचे असेसमेंट करणं शक्य होईल. 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्री लोडेड टॅब देणे शक्य असल्यास त्याबाबत शासनाने निर्णय करावा, अशी मागणी कपील पाटील यांनी केली आहे.

कपील पाटील यांची शासनाला कळकळीची विनंती-

1. कोणत्याही परिस्थितीत तूर्त शाळा, कॉलेज उघडण्यात येऊ नयेत.
2. कोविड ड्युटीवर असणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब परत बोलवावे.
3. सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम पध्दतीने अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे.
4. वर्क फ्रॉम होम मध्ये वर्क लोड वाढतो ही बाब लक्षात घेऊन अन्य आस्थापनेवर गेलेल्या सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत पुन्हा बोलवावे.
5. शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 क्लब करून, सुट्ट्या कमी करून झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढावे.

महत्वाच्या बातम्या-

-चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा…- मनमोहन सिंह

-“…त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी मला शहाणपणा शिकवू नये”