‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये- संजय राऊत

मुंबई | लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांचा जो काळ गोठला आहे त्याला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा हरिओमची घोषणा केली. ‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. म्हणून सरकारी दिलदारीचा गैरवापर कोणी करू नये, अशी अपेक्षा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचा बंदीवास व देश गुलामीच्या बेड्यांत असताना ‘पुन:श्च हरिओम’ चा नारा दिला होता. आता ठाकरे सरकारने देश स्वतंत्र असताना आणि जनता टाळेबंदीच्या बेड्यांत जखडलेली असताना तोच ‘पुन:श्च हरिओम’ चा नारा देऊन जनजीवनात प्राणवायू फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेने बेभान आणि बेबंद होऊन जगू नये. ‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. तूर्त तरी ‘पुन:श्च हरिओम’ चे स्वागत करूया, असं राऊत अग्रलेखात म्हणाले आहेत.

देशभरात सोमवारपासून पाचवी टाळेबंदी जाहीर झाली आहे, पण या टाळेबंदीतही जीवनास आरंभ करावा असे ठाकरे यांनी सुचवले आहे. टिळक तेव्हा तुरुंगातून मुक्त झाले व महाराष्ट्राची 11 कोटी जनता टाळेबंदीच्या तुरुंगातून या पुढे तीन टप्प्यांत मुक्त होणार आहे. जनतेने दोनेक महिने कडक तुरुंगवास भोगला आहे. या दोन महिन्यांत जीवनाची दिशा पूर्णपणे बदलली, असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात दुकाने आलटून पालटून उघडली जातील. धार्मिक उत्सव होणार नाहीत व देवळेही बंदच राहतील. म्हणजे माणसांना ‘पुन:श्च हरिओम’ करण्याची जी सवलत मिळाली आहे ती सवलत मंदिरांना मिळणार नाही. मंदिरांची टाळेबंदी कायम आहे. सलूनही उघडणार नाहीत. लोकांनी दुकानात किंवा बाजारात जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा. आता लोकांनी सायकली आणायच्या कुठून? व सायकल वापरायची सवय राहिली आहे काय? पण ही एक शिस्त आहे व ती पाळावी लागेल, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाऊनमध्ये घरमालकिणीचा भाड्यासाठी तगादा, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

-सगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, अन्यथा शाळांवर कारवाई करणार- शिक्षणमंत्री

-खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

-गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

-जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट