…म्हणून दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार; तृप्ती देसाईंचा इशारा

पुणे : अनेक दिवसांपासून महिलांची राज्य सरकारकडे दारुबंदीची मागणी आहे. मात्र सरकारकडून महिलांची मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. त्याच्याच निषेधार्थ भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं दारुच्या बाटल्यांचा हार घालून पुण्यात स्वागत करु, असा इशारा दिला आहे. 

अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. दारुच्या बाटल्यांचा हार घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार, असा संतप्त इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला दारूबंदीसाठी अनेक मोर्चे काढत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. युवकांचे नुकसान आणि प्राण जात आहेत तरीसुद्धा राज्य सरकार “महाराष्ट्रात दारूबंदी” करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

राज्य सरकारची “दारूची बाटली म्हणजे मृत्यूची बातमी ” अशी जाहिरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण हीच दारूची बाटली राज्य सरकारच्या परवानगीनेच सर्वांना देण्यात येत आहे. तातडीने महाराष्ट्रात दारूबंदी करावी. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात पहिल्या पाच मुद्द्यांपैकी “दारूमुक्त महाराष्ट्र” हा मुद्दा घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही  तृप्ती देसाई यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत उद्या सायंकाळी पाच वाजता भूमाता ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्र्यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांच्या बरोबरील इतर मंत्र्यांनाही दारूच्या बाटल्या हातात घेऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-