कर्जमुक्ती करून आपण शेतकऱ्यांवर उपकार करत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत अशा भूमिकेतून त्यांना मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या 35 दिवसांत पूर्ण केले. हा ‘जोश’ असाच टिकवून ठेवा व 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आता आपले सरकार केंद्र, बँका, रेशन दुकानदार यांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे. 21 फेब्रुवारीपासून गावोगाव याद्यांची प्रसिद्धी आणि आधार प्रमाणीकरण सुरू होणार आहे. तसेच 11 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते याची पडताळणी सुरू होणार आहे, असं ते म्हणाले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 88% पात्र शेतकऱ्यांचा डेटा पोर्टलवर अपलोड झाला आहे. आत्तापर्यंत 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंद झाली आहे तसेच 95% आधार जोडणी पूर्ण झाली असून यासाठी सर्व बँकांचे संपूर्ण सहकार्य आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीकडे राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष असून योजनेच्या अंमलबजावणीचा दररोज आढावा घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-बजेटवरून माजी अर्थमंत्र्यांच्या टीकेचा बाण आजी अर्थमंत्र्यांवर!

-माझ्या आमदारकीचा पगार मी सामाजिक गोष्टींसाठी वापरेल- रोहित पवार

-रोहित पवारांच्या हेलिकॉप्टरच्या स्वप्नावर तरूणाचा थेट त्यांनाच प्रश्न!

-महामोर्चाआधी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीसा

-नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत