मुंबई | एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तब्बल 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन झालं आहे.
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर खरी शिवसेना नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत होता. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळ असल्याने खरी शिवसेना म्हणजे आम्हीच असा दावा केला जात होता.
शिवसेनेने शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. मात्र, आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचे सांगत शिंदे गटानेच बहुमत चाचणीपूर्वी शिवसेना आमदारांना व्हिप जारी केला.
बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाच्या बाजूने मतदान करा असा आदेश शिंदे गटाने जारी केला होता. मात्र, शिवसेनेच्या 15 आमदारांनी हा व्हिप मोडल्याचं पाहायला मिळालं.
बहुमत चाचणीत व्हिप मोडत शिंदे गटाविरोधात मतदान केल्याने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सेना आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. सेनेच्या 15 पैकी 14 आमदारांना गोगावले यांनी नोटीस बजावली आहे.
आदित्य ठाकरे यांना मात्र कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही. तर आम्ही बाळासाहेबांचा आदर करतो आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवली नाही, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठं भगदाड पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सेनेच्या 15 पैकी 14 आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याने शिवसेनेचं टेंशन वाढलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यासाठी पुढचे पाच दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी
“आम्हाला डुक्कर म्हणता आणि आमच्याच मतांवर खासदार म्हणून निवडून जाता”
मोठी बातमी! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर, ‘या’ व्यक्तीला जामीन मंजूर
‘सगळ्यात नशिबवान कोण तर ते देवेंद्र फडणवीस कारण…’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी