त्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी शिवसेनेशी गाठ आहे- धैर्यशील माने

कोल्हापूर  | महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. गुरूवारी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा माने यांनी समाचार घेतला.

गेल्या 64 वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररीत्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

भीमाशंकर पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी तसं सांगावं, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील. पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावं, असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बेजबाबदार वक्तव्यांनी शांतता भंग करू नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. अज्ञानातून केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, असंही माने यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-