परळीत मराठा समाजाचा रात्रभर ठिय्या; मोर्चा अजूनही सुरुच

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने परळीमध्ये ठोक मोर्चा काढला आहे. काल सुरु झालेला हा मोर्चा अजूनही सुरु आहे. परळी तहसील कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी रात्रभर ठिय्या मांडला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर मूक मोर्चे काढले होते. मुंबईच्या मोर्चावेळी सरकारने लवकरात लवकर आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आरक्षण मिळालं नाही त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली आहे. परळीत लाखोच्या संख्येने मराठा बांधव तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत.

लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या जागेवरुन उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. सरकारने दडपशाही केली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. 

आषाढी एकादशीच्या आधी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांना विठ्ठलाची शासकीय पूजा करु देणार नाही– मराठा आंदोलक