आता हेडलाईन मॅनेजमेंट पुरे झालं, आर्थिक मंदी मान्य करा-प्रियंका गांधी

नवी दिल्ली | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आर्थिक मंदीवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असल्याचं सरकारनं मान्य करायला हवं असं, त्यांनी म्हटलं आहे. ट्विटद्वारे त्यांनी मंदीबाबत भाष्य केलं आहे.

कोणतंही खोटं शंभरवेळा सांगितल्याने ते खरं होत नाही. भाजप सरकारला आता हे मान्य करायला हवं की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवर काम करणं गरजेचं आहे, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत हेडलाइन मॅनेजमेंटने काम चालवणार आहे, असं म्हणत प्रियांका गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यापूर्वीच आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होणार असल्याचं भाकित केलं होतं. याला त्यांनी ‘मॅन मेड क्रायसिस’ असं म्हटलं होतं.