मुंबई | महाराष्ट्रात सत्तापालट झालं मात्र मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. त्यात 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं आहे.
शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला असून त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधायला सुरूवात केली आहे.
राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी नेत्यांशी संवाद साधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्याचा एक किस्सा उद्धव ठाकरेंनी सांगितला आहे.
राजनाथ सिंह यांनी फोन करून अस्सलाम वालेकुम म्हटलं. मात्र, या शब्दावर नाराजी दर्शवल्यानंतर त्यांनी जय श्रीराम म्हणत चर्चा पुढे सुरू ठेवली, असा खुलासा उद्धव ठाकरेंनी एका बैठकीत केला आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजनाथ सिंहांकडून देशातील प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांशी फोनवरून चर्चा करत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत.
उद्धव ठाकरेंनी सांगितलेल्या या संभाषणावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून मात्र अशाप्रकारे कोणताही संवाद झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशा प्रकारचा कोणताही संवाद झाल्याचं नाकारलं आहे. राजनाथ सिंह यांना याबाबत विचारणा केली असताना असं काहीही झालं नसल्याचं ते म्हणाले. त्यामुळे हे सर्व खोटं असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह यांना मेहबुबा मुफ्तींना फोन लावायचा असेल पण चुकून उद्धव ठाकरेंना लागला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला ईडी आली नाही पण फक्त…’, बंडखोरीनंतर शीतल म्हात्रेंचं स्पष्टीकरण
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा मोठा दावा, रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ
शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा जाहीर करताच बाळासाहेब थोरातांचं सूचक ट्विट, म्हणाले…
‘काय तो दांडा आणि काय ते ढुं..’ म्हणत शिंदे गटावर निशाणा साधणाऱ्या प्रवक्त्याही शिंदे गटात!
पुणेकरांनो सावधान… खडकवासला 100 टक्के भरलं, नदीचं पाणी वाढतंय!