“लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले”

मुंबई |  उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपत प्रवेश केला. हा प्रवेश राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजेंचा खरपूस समाचार घेतला आहे. लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले नेते पळपुटे निघाले, असं म्हणत त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.

शरद पवार आज नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंचं प्रत्यक्ष नाव घेणं टाळलं मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना लक्ष्य केलेलं दिसून आलं.

पळपुट्या नेत्यांचा आता जनताच समाचार घेईल. सोडून गेलेले नेते जनतेच्या विकासासाठी नव्हे तर स्व:ताची कातडी वाचवण्यासाठी गेले आहेत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

उदयनराजेंनी केलेला पक्षबदल जनतेसाठी किंवा विकासासाठी नव्हे तर स्वता:चं काहीतरी झाकण्यासाठी केला आहे, असा हल्लाबोल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत 15 वर्षे फक्त अडवाअडवीचं आणि जिरवाजिरवीचं राजकारण झालं. भाजप शिवरायांचा विचार घेऊन पुढे जात आहे, म्हणून भाजपात प्रवेश केला आहे, असं उदयनराजेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-