अजित पवार शिंदे गटावर संतापले; म्हणाले, “यांना आम्ही गद्दार म्हंटले की…”

जळगाव | राज्यात सध्या वेदांंता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे वादंग सुरु आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरत आहे.

तर दुसरीकडे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवीत आहेत. त्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्ला चढविला. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्याचे काम अद्याप झाले नाही, त्यावर त्यांनी भाष्य केले.

तसेच अजित पवार यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे तो परत आणण्याचे प्रयत्न करावेत, अशा आशयाचे एक पत्र देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर सडकून टीका केली. ज्याप्रमाणे सरपंच जनतेतून निवडून येणार आहे, तशाचप्रकारे मुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडून आणा, असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, दीड लाख रोजगार निर्मीती करणारा हा प्रकल्प राजकीय दबावाने गुजरातला गेला आहे. महाराष्ट्रात तळेगाव येथे पोषक वातावरण असताना देखील हा प्रकल्प गेला.

शिंदे यांच्या बंडात सामील होऊन सूरतला गेलेल्या आमदारांमध्ये औरंगाबाद (Aurangabad) आणि जळगाव (Jalgaon) येथील आमदार होते. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना आम्ही गद्दार म्हंटले की यांचे दाबे दणाणते, असेही पवार म्हणाले.

फुले-शाहूंच्या राज्यात ही गद्दारी चालणार नाही. गद्दारी करणारे पुन्हा निवडून येणार नाही, असेही पवार म्हणाले. पुढील निवडणुकांत कोण निवडून येतो, हे मी पण पहाणार आहे, असे देखील पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –