…आणि मी राष्ट्रवादीचा झालो; दिलीप सोपलांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

सोलापूर : शिवसेना हे एक वेगळंच रसायन आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोण आलं कोण गेलं याचं काहीच घेणे देणे नसते. बाळासाहेबांचे विचार आजही जिवंत. म्हणून कार्यकर्ते बाळासाहेबांच्या पाठीशी आहेत. अनेक भाकीत करणारे तोंडघशी पडले. मात्र अनेक संकटांना तोंड देत उद्धव ठाकरेंनी संघटना मजबूत ठेवली, असं शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल यांनी नमूद केलं.  

अपक्ष निवडणूक लढल्यानंतर मी शिवसेनेला साथ दिली. बाळासाहेबांची आणि माझी वेव्ह लेन्थ जुळते, हे काही जणांना आवडलं नाही. त्यामुळे मला कट केलं गेलं आणि मी राष्ट्रवादीचा झालो, असं दिलीप सोपल यांनी सांगितलं. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्धार मेळावा सोलापुरात पार पडला. यावेळी पूर्वाश्रमीचे दिलीप सोपल यांनी प्रथमच जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत भाषण केलं.

पक्षात जास्त काम करणाऱ्याचे तिकीट कापले जाते, त्यामुळे मी चिन्ह बदलल्याशिवाय निवडून येतंच नाही, असं दिलीप सोपल म्हणाले. एकच चिन्ह रिपीट झालं की पडतो. त्यामुळे मी चिन्ह बदलत बदलत इथपर्यंत आलो, अशी मिश्किल टोलेबाजी सोपलांनी केली.

कधी कधी माझं तिकीट कटलं गेलं. मग मी कटलं तर कटलं आपलं पाप फिटलं असं म्हणत काम करत राहिलो. लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह व्यवस्थित असतं. जीवनात अनेक कटू आठवणी असतात, मात्र त्या उगाळत बसायच्या नसतात, असंही दिलीप सोपल म्हणाले आहेत. 

एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आल्यानंतर आधीच्या लोकांना चांगलं- वाईट न बोलण्यात अर्थ नसतो, असं सोपल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-