पक्षांतर करताच कोणी किती भूखंड घेतलेत असं म्हणत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा!

मुंबई | सध्या महारष्ट्रातील राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीवर नाराज होते. यामुळे एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चा चालू होत्या. आज अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर तब्बल 72 बड्या नेत्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांवर टीका करत इशारा दिला आहे.

काही दिवस थांबा कोणी किती भूखंड घेतल्यात हे तुम्हाला सांगतो, अशा शब्दात खडसे यांनी विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला आहे. मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी सांगतो कोणी काय केलं ते. मी याविरोधात आवाज उठवेन, असं नाथाभाऊंनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रवादीने आज मला प्रवेश दिला नसता तर माझ्यावर संन्यास घेण्याची वेळ आली असती, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांवर खडसे यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे टीका देखील केली आहे.

चार दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले नेते मला मार्गदर्शन करण्याचे सल्ले देत आहेत. तुम्हाला पहाटेच्या पाच वाजता शपथविधीसाठी राष्ट्रवादी कसा चांगला वाटतो त्यापेक्षा कितीतरी चांगला राष्ट्रवादी मला आता वाटतो, अशा शब्दात खडसे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची कन्या रोहिणी खडसे आणि पत्नी मंदाकिनी यांनी देखील आज हातावर घड्याळ बांधलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. खडसे यांच्यासह तब्बल 72 नेत्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

नंदुरबार तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील या नेत्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह इतर 72 नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज झेंडा हाती घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-