“सरकारमध्ये कोणाशी बोलायचं हे राज ठाकरेंना चांगलंच माहितीये”

मुंबई | गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचं विलगीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र, कामगारांच्या या मागणीला राज्य सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिल्यानं हे आंदोलन चिघळताना दिसतंय.

एसटी महामंडळाकडून सध्या संपावर गेलेल्या कामगारांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. आज 542 कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 918 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

आता हे आंदोलन चिघळलेलं असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली आहे. कृष्णकुंजवर जाऊन शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

आत्महत्या करू नका, आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचा नाही. आपल्याला ही लढाई पुर्ण करायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद असायला हवी असं, राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी तुमच्या लढ्याचं नेतृत्व करेन. पण तुम्ही आत्महत्या करू नका ही माझी अट आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मी याबाबत राज्य सरकारशी चर्चा करून नंतर तुमच्याशी बोलेन, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीविषयी माहिती दिली आहे.

आज राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर ते आता राज्य सरकारशी चर्चा करणार आहेत. लवकरच ते तातडीने सरकारशी बोलतील. स्वत: राज ठाकरे या प्रकरणात जातीनिशी लक्ष घालून चर्चा करणार आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचा नाही, मनसे या लढाईत तुमच्यासोबत असेल, असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी दिल्याचं नांदगावकरांनी सांगितलं. राज ठाकरे यांना राज्य सरकारमध्ये कोणाशी बोलायचंय हे माहिती आहे आणि ते बोलतील, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरे सरकारमधील कोणाशी बोलतील हे तुम्हालाही माहित आहे, असंही नांदगावकर म्हणाले आहेत. आम्ही पक्ष म्हणून आणि आमचे वकिल देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहेत. आम्ही आता कायदेशीर लढाई देखील लढू असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

दरम्यान, आम्हालाही सातवा वेतन आयोग लागू केलं तर हे महत्त्वाचं पाऊल ठरेल, असंही या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांना सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”

  फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”