रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा

मुंबई | शिवसेना नेते आणि राज्याचे माजी मंत्री रामदास कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) यांनी सध्या शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याचं चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी सरकारविरोधात (MVA Government) आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आमदार कदम यांनी विधानपरिषदेत खेड नगरपंचायतीतील कारभारावरून सरकारला चांगलंच घेरलं आहे. खेड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सरकारी कामात भ्रष्टाचार केला आहे. सरकारनं अद्यापी त्यांच्यावर कारवाई का केली नाही?, असा सवाल कदम यांनी सरकारला केला आहे.

रामदास कदम यांनी सभागृहात वैभव खेडेकर यांच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यानिमित्तानं कदम यांनी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.

वैभव खेडेकर यांनी सरकारी पैशांचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होवूनही सरकार मुग गिळून गप्प आहे. खेडेकर हे सरकारचे जावई आहेत का?, भ्रष्टाचारी माणसाला पाठिशी का घातले जात आहे?, असा सवाल कदम यांनी केला आहे.

राज्याच्या नगरविकास खात्याने खेडेकर यांच्यावर कारवाई केली नाही तर मी न्यायालयात जाईन असंही कदम म्हणाले आहेत. परिणामी कदम आता आपल्याच सरकारविरोधात न्यायालयात जाणार का? याची चर्चा आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. या आरोपांच्या माध्यमातून कदम यांनी थेट शिंदे यांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

वैभव खेडेकर यांनी बौद्धवाडीसाठी जाणाऱ्या मार्गावर पुल बांधण्यासाठी राज्य सरकारकडून 20 लाख रूपये निधी घेतला आहे. मात्र या निधीचा वापर एका खाजगी इमारतीकडं जाणाऱ्या मार्गावरील पुल बांधण्यासाठी करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

वैभव खेडेकर यांच्यावर एकूण 11 भ्रष्टाचाराचे प्रकरण सिद्ध झाले होते. परिणामी सरकारनं या भ्रष्टाचार करणाऱ्या नगराध्यक्षांना पदावरून काढून टाकावं असं कदम म्हणाले आहेत. कदम यांनी सभागृहात सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही.

दरम्यान, रामदास कदम यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्यानं ते शिवसेनेपासून लांब जात असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. या सर्व आरोपांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंद काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”

‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल

1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज

फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…