“…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंना विशेष पुरस्कार दिला पाहीजे”

मुंबई |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे

एवढे निर्बंध घालून देखील राज्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यामुद्यावरुन विरोधी पक्षनेते राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. हे अतिशय घातक असून, कोरोना परिस्थितीवरील निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन खूप घातक असून याची बाधा लवकर होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना पाहायला मिळत आहे.

देशात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे.  सध्या राज्यात 2,52,364 रुग्ण कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नांदेड, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्येमध्ये जास्त प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरत आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये व अस्थपनामध्ये आरोग्यसेवा, अस्थापनना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-