“सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी असतील, तर मग अजित पवार निर्दोष कसे?”

मुंबई | राज्यातील सिंचन घोटाळ्यात अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दोषी ठरले आहेत. मग प्रकल्पांना अंतिम मंजुरी देणारे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार निर्दोष कसे असू शकतात?, असा सवाल माजी मुख्य अभियंते विजय पांढरे यांनी उपस्थित केला आहे.

सिंचन घोटाळ्यात 15 ते 20 अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत. या सगळ्या फाईल्स मंजूर होत असताना त्यावर शेवटची सही ही कॅबिनेट मंत्र्यांची असते. त्यामुळे एखाद्या प्रकरणात अधिकारी दोषी असतील तर शेवटची सही करणारा मंत्रीही दोषी ठरायला पाहिजे, असंही विजय पांढरे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही भ्रष्टाचाराला पायबंद घालू, अशा घोषणा देत होते. आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगाच्या दारापर्यंत आणले आहे. आता निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना तुरुंगात घालू, असं आश्वासनही भाजपनं दिलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता या घोषणा हवेत विरल्याचं दिसत आहे, असंही विजय पांढरे यांनी म्हटलय.

दरम्यान, जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी सर्व नियमांना फाटा देत फक्त नऊ महिन्यात तब्बल 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. महिन्यांच्या हिशेबानुसार, जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यातच 32 प्रकल्पांना मंजुरी मिळाली होती.

 

महत्वाच्या बातम्या-